टिवल्या – बावल्या ! मराठी कथा |

आगामी मराठी दीर्घ कादंबरी :-

लेखक :- श्री. योगेश वसंत बोरसे
Sample :-
टिवल्या ,बावल्या ,दोन शाळकरी मुलं ,म्हणजे प्राथमिक शाळेतली ,म्हणजे साधारण तिसरीची मुलं ! शाळा एका पाड्यावरची ,शे पाचशे वस्तीचा पाडा ,अशेच अवती भवती अजून काही पाडे होते ….
खरं तर ही त्यांची खरी नावं नव्हती . पण ही दोघं शाळेत कमी आणि बाहेर जास्त हुंदडायची … जसं कानात वारं भरलेलं वासरू असतं तसं …. कधी मंदिरात ,कधी माळरानावर ,कधी टेकडीवर ,कधी जवळच्या जंगलात … कधी पाणवठ्यावर ..
बरं ,घरी असले तरी गोंधळ घालणार ….. त्यापेक्षा घरच्यांना ते बाहेर राहिलेले परवडत ! म्हणायला मित्र होते पण प्रेम सख्या भावापेक्षा कमी नव्हतं . जसं काही जुळेच होते ! फक्त दोघांची आई-बाप वेगळे होते .
शाळेचा गणवेश जमलं तर घातला जायचा . पण मुलं सकाळी कपडे घातले की तेच दिवसभर अंगावर ठेवायचे ,घरी वेगळं ,शाळेत वेगळं ….अशी पद्धत नव्हती आणि कुणाची ऐपत ही नव्हती .
सोमवारचा दिवस ,शाळेचा पहिला दिवस !
पोरांनी अंघोळ केली ,कपडे घातले आणि दप्तरं उचलली . दप्तर म्हणजे एक पिशवी ,एक पाटी ,पेन्सिल नांवाला एक वही ,एक पुस्तक ,अन एका कापडात भाकरीचे तुकडे गुंडाळलेले ,पण उत्साह असा होता की मोठ्या नेत्याला लाजवेल .
टिवल्या बावल्याने दप्तरं उचलली आणि शाळेकडे धूम ठोकली …..
शाळेत आले ,शाळा बंद ! आनंद ही झाला आणि आश्चर्य ही वाटलं .
” का रे टिवल्या ,शाळा तर बंद आहे ! सुट्टी हाये की काय कसली ?”
” असल काहीतरी ! त्या शिवाय का बंद राहील ? पन मास्तर ही दिसत नाई ..”
” आरं येडा हायेस का ? सुट्टी असल्यावर मास्तर कशाला येईल ? ” टीवल्या म्हणाला . पण बावल्या हुशार होता .
” अरे मी किती वेळा मास्तरला सुट्टीच्या दिवशी शाळेत बघितलंय . काही तरी करत असतात वही वरती … चल आत जाऊन बघू …..हायेत का ते ! ”
दोघं शाळेच्या पायऱ्या चढले . दोन चारच खोल्यांची शाळा होती . पण ऑफिसचा दरवाजा उघडा का बरं…..
त्यांनी आवाज दिला ,पण उत्तर मिळालं नाही .
” मास्तर ,ओ … मास्तर ….. ”
आवाज देत देत आत गेले …. ऑफिसचं दार लोटलेलं होतं ….
” बघ मी म्हटलं नव्हतं ,मास्तर असेल म्हणून ! “
बावल्याने समर्थन केलं आपल्या बोलण्याचं ,
” चल पाहू … मास्तर हाये का !”
” ए नको ! चल पळ इथून ! मास्तर ने पाहिलं तर काही काम लावून देईल . आपल्याला नाही म्हणता येणार नाही . “
” आरं सुट्टी हाये आज … शाळा बंद हाये ! …. काय काम असणार चल …. ” बावल्या ऐकायला तयार नव्हता .
टीवल्याचा नाईलाज झाला . दोघे दबकत दबकत ऑफिसच्या दारापर्यंत पोहोचले . दार लोटलं आणि … दोघे जागच्या जागी थांबले …..
त्यांचं डोकं काम करत नव्हतं . असं कसं झालं ? कुणी केलं ? का केलं ? ….
” टिवल्या …. पळ .. ”
बावल्या भानावर येऊन ओरडला आणि पळाला . पण टिवल्याची नजर समोरच्या दृश्यावरून हालत नव्हती . बावल्या पुन्हा मागे आला आणि टिवल्याला हात धरून ओढू लागला .
” टिवल्या …. चल पळ …. “
टिवल्या भानावर आला आणि जोरात बोंबलला .
” ए अरे ,बोंबलू नकोस . कुणी पाहिलं आपल्याला तर बोंब होईल . ”
आणि समोरून मास्तर येताना दिसले . तसे दोघे चक्रावले .
‘ हा काय प्रकार ए ? ‘
” का रे पोरांनो ? इथं काय करताय ? अरे आज नारळी पौर्णिमा ! शाळेला सुट्टी आहे . आणि एवढं घाबरायला काय झालं ?”
” गुरुजी ,गुरुजी …. “
” अरे काय झालं ?”
” गुरुजी ,तिथे कुणी मरून पडलंय ….. तुमचं कपडे घालून … तोंड … पार ठेचलंय … वळखायला येत नाहीय … आमाला पाहिले वाटलं की … ” पोरांना पुढे बोलवत नव्हतं …
गुरुजी समजले ,यांना काय म्हणायचंय ते … ” चला तर बघू ..”
” … नाही गुरुजी ! एकटे जाऊ नका … नाहीतर तुमच्यावर आफत यायची … आमी दोन चार लोकांना आवाज देतो . तोवर इथंच थांबा ! .. तिकडं जाऊ नका …”
गुरुजींना या उनाड मुलांच्या प्रसंगावधानतेचं कौतुक वाटलं .
” ठीक ए ,कुणी एकाने जा आणि एकाने माझ्या सोबत थांबा ! “
ते एवढं म्हणायचा अवकाश ! टिवल्या पळालाही …. आणि काही वेळात जवळपासच्या पाड्यावरची पाड्यावरची दोन चार डोकी सोबत घेऊन आला .
त्यांच्या हातात काठ्या होत्या आणि एक दोन घोंगड्या होत्या .
टिवल्या बावल्या पुढे ,मागे गुरुजी मागे ही चार डोकी . पोरांच्या हिमतीचं सगळ्यांना कौतुक वाटत होतं . सर्व जण ऑफिस जवळ पोहोचले .. दरवाजा उघडाच होता .
.. समोरचं दृश्य भयानक होतं . समोर कुणीतरी मारून पडलं होतं .म्हणजे मारलं गेलं होतं ,असं वाटत होतं की गुरुजी समजून मारलं होतं .
कारण मरणाऱ्याच्या अंगावर गुरुजींचे कपडे होते .
‘ पण मरण एवढं भयानक असू शकतं ?
आणि गुरुजींचे कपडे याच्या अंगावर कसे आले ?
आणि हा आहे तरी कोण ?
कसं समजणार ?’
बघता बघता आजू बाजूच्या चार पाच पाड्यावरची गर्दी शाळेत जमली . भय ,उत्सुकता ,रिकामा वेळ ,मुलांची काळजी ,अन शाळेचं भवितव्य ,सर्वच तिथे एकत्र आलं होतं ….
पाड्यांवरील प्रमुख पुढे झाले . त्यांनी परिस्थितीचा ताबा घेतला .अगोदर पोरांना बाहेर पिटाळलं आणि ऑफिसचं दार बंद केलं .
” गुरुजी ? काय प्रकार हाये ? तुमची कुणाशी दुश्मनी हाये का ? “
” अहो , मला दोन महिने ही झाले नाहीत इथे बदली होऊन . मी कुणाला नीट ओळखत ही नाही . मग दुश्मनीचा प्रश्न कुठून येतो ?”
” म्हणूनच म्हणलं ! पहिले जिथे होता तिथे काई कांड केलं होतं का ? म्हणून तुमची बदली इकडं झाली . कुणी तरी तुमाला मारायचा प्रयत्न केलाय . गुरुजी समजून घ्या ,तुमच्या जीवाला धोका हाये ! हा कोण ए ते तर लगेच समजून जाईल ! ….. “
त्या प्रमुखातील एक गंगो होता . त्याने सर्व लीड आपल्याकडे घेतला होता .
” नारबा ,गण्या ,पंढरी … पाड्यावरचा कुणी गायब झालंय का चौकशी करा . कि हा कुणी बाहेरचा हाये ? अन इथं येऊन मेला . बाहेरचा असेल तर काई नई ,चिता पेटवून जाळून टाकू ! पण आपल्या पाड्यावरचा असल तर … चला लागा कामाला ! …”
” आरं गंगो ,पन पहिले हे मढं तर जमिनीवर ठेवावं लागल . कधीचा असा पडलाय काय माहित ? मेलेल्या जीवाला कशाला त्रास ? “
नारबाचं म्हणणं सगळ्यांना पटलं . तशी एक घोंगडी खाली टाकली आणि एक ……
हो … टेबलाच्या पलीकडे खुर्चीवर ती व्यक्ती बसली असणार .आणि डोकं टेबलावर ठेऊन कुणीतरी त्याचं डोकं ठेचले असणार . पण एवढं ठेचायची काय गरज होती ?
नुसतं मारायचं होतं तर एक घाव पुरेसा होता . पण नाही … प्रकरण काही वेगळंच होतं !
मारण्या पेक्षा ,मारून बदला घेणं समोरच्याला जास्त संतोष देणारं समाधान देणारं असावं ….
त्या शवावर एक घोंगडी टाकून ते तसंच गुंडाळलं गेलं . आणि खालच्या घोंगडीवर टाकलं गेलं .
” गंगो ,पोलिसाला खबर द्यावी लागल ! ” नारबा म्हणाला .
” हे कायतरी येगळंच हाये . अन हा माणूस अपल्या पाड्यावरचा वाटत नाही . याच्या हातात घड्याळ ए ! आपन कुणी इथं घड्याळ घालत नाई ,एक गुरुजी सोडला तर … “
” पण हा इथं कसा आला ? कसा मेला ?”
” ते आपलं काम नाई ,पोलिसांचं हाये … “
तिथून पोलीस स्टेशन १० ते १५ किमी लांब असेल . एवढ्या पूर्ण परिसरात तेवढी एकच चौकी होती . तशी काही गरज पडायची नाही कधी . पाड्यावरची लोकं ,हातावर पोट . कधीतरी मारामाऱ्या झाल्या तरी आपापसात मिटवून घ्यायचे . गोष्ट आपापसात राहायची . त्या पलीकडे दुसरं कधी काही अनुचित घडलं नव्हतं ….
पहिल्यांदाच कुणाचा खून झाला होता . त्यामुळे सर्व जण उत्तेजित झाले होते . उत्सुक होते . भयोत्सुक होते . एक जण पोलीस स्टेशनकडे रवाना झाला . आणि पोलीस ही सतर्क झाले . तिथून तालुका पोलीस स्टेशन ला फोन केला गेला . तिथून पूर्ण टीम आली .
अर्थात पूर्ण चार्ज त्यांच्याकडेच असणार होता .
दुपार पर्यंत पोलिसांचा ताफा शाळेच्या आवारात पोहोचला . बघ्यांची गर्दी झाली होती . पोलिसांना पाहताच अर्धी गर्दी कमी झाली . नसतं झेंगाट नको म्हणून ….
त्यामुळे फक्त ज्यांना जबाबदारीची जाणीव होती आणि ज्यांनी अगोदर बघितलं तेवढेच तिथे थांबले . म्हणजे शाळेच्या आवारात …. तर काही दूर उभे राहून गंमत बघत होते.
” काय भानगड ए ?” इन्स्पेक्टर जाधव ने विचारलं तसा गंगो पुढे आला ” साहेब शाळेत कुणाला ठेचून मारलाय , त्या ऑफिस मध्ये ! “
” शाळेत ? ते ही ऑफिसमध्ये ? कुणी शाळेत येत नाही का ? ”
तसे मास्तर पुढे आले .
” साहेब ,आज सुट्टी आहे नारळी पौर्णिमेची . “
” तुम्ही .. “
” मी काळे ! शरद काळे ! इथे शिक्षक आहे ! ”
” आणि बाकीचे .”
” नाही ! सध्या तरी मी एकटाच आहे ! आणि साहेब एक विचित्र गोष्ट म्हणजे मलाच मारणार होते बहुतेक ! “
” काय .? “
” हो साहेब ! कारण शाळेत मी ऑफिस ला एकटाच असतो . त्यात जो मरून पडलाय त्याने माझ्या सारखच घड्याळ घातलय आणि कपडे ही !
मी एकटाच असल्यामुळे शाळेचा वेळ पुरत नाही ,त्यामुळे माझा बराचसा वेळ शालेय कामात ,ऑफिसात जातो .कामं संपता संपत नाहीत आणि हे बहुधा मारेकऱ्यांना माहित असावं .
आज ही सुट्टी असताना काही कामं अर्जंट संपवणं गरजेचं असल्याने आलो होतो तर माझ्या अगोदर ही मुलं शाळेत दिसली .”
तसे टिवल्या बावल्या पुढे आले .
” का रे ? आज सुट्टी आहे ना ? मग शाळेत काय करत होतात ?”
दोघांना समजेना काय बोलावं ? उनाड असली तरी पोलिसांना पाहून घाबरली होती .
” साहेब ,त्यांना माहित नव्हतं आज सुट्टी आहे ते . ते शाळेत कमी आणि बाहेरच जास्त असतात . ” काळे गुरुजी प्रेमपूर्वक म्हणाले .
” ऑफिस कुठाय ? ” इन्स्पेक्टर ने विचारलं .
” बॉडीला कुणी हात लावला नाही ना ?”
तसं यांचं धाबं दणाणलं ……..
To Be Continued …..
ALL RIGHTS RESERVD AT YOGESH BORSE & BGSM PRODUCTION , BHUTATMA PUBLICATION