त्या जुन्या मातीच्या घरात | मराठी रहस्यमय भयकथा |


लेखक :- योगेश वसंत बोरसे .
ही माझ्या नवीन कादंबरीची सुरुवात आहे . तुम्हाला नक्की आवडेल अशी खात्री आहे ……
नमस्कार :- माती , घर … यांच्याशी आपलं खूप जुनं नातं असतं . पण नाविन्याच्या शोधात नावीन्याच्या हव्यासाने , आपल्या महत्वाकांक्षांनी आपण जुन्या गोष्टींशी नाते तोडतो . आपल्या जगात वावरायला लागतो . पण जेव्हा या गोष्टी आपल्याला साद घालतात तेव्हा …?
अशी एखादी कथा निर्माण होते …..
सुलक्षणा .. नावाप्रमाणेच सुलक्षणी होती . तिला आपलं असं कुणी नव्हतं . म्हणजे … आता राहिलं नव्हतं … म्हणजे तिच्या लेखी त्यांना किंमत नव्हती . आणि का असावी ? हाच तिचा प्रश्न होता . …
वैशाख वणवा पेटला होता …अर्थात कडाक्याचं ऊन अंगाची लाही लाही करत होतं … अन त्या कडाक्याच्या उन्हात सुलक्षणा आपल्या छोटयाश्या घराच्या मातीच्या भिंतींना ,आतून , बाहेरून मातीने लेपन करत होती . वरचं छत जमेल त्या काड्या कामट्यांनी ,झावळ्यांनी आच्छादलं होतं .तर कुणी दिलेलं फाटकं प्लास्टिक हि त्या छताचा हिस्सा झालं होतं ,एक भाग झालं होतं . बाहेर मन मानेल तेवढं अंगण तिचंच होतं ! तिच्यासाठी ते घर होतं ,तिची वास्तू होती ,पण इतरांसाठी …झोपडी …. !
…..कारण गावात वस्तीच्या मध्यभागी असून ही तिच्या सभोवतालचा जवळजवळ एक किलोमीटर चा परीघ जागा रिकामी होती . जी काही वस्ती ,घरे , दुकाने , शाळा ,जे काही होतं ते सर्व तेवढी जागा सोडून होतं ! कुणी प्रयत्नच केला नाही , तिथे राहण्याचा , जम बसवण्याचा असं नाही . पण ज्यांनी काही केलं ते एक तर संपले होते . संपवले गेले होते नाहीतर वेड तरी लागलं होतं …….
असं असताना सुलक्षणा साधारण ५० वर्षांपासून तिथे अगदी सहज राहत होती . तिच्या बाबतीत कुणाला फारसं माहित नव्हतं . आणि ज्यांना काही माहित असेल ते बोलायची हिंमत करत नव्हते . कारण सुलक्षणाच्या असण्याला प्रथम पासूनच एक गूढ वलय निर्माण झालं होतं ..
ती लोकांकडे घरकाम करायची . धुनी भांडी तर कुणाच्या घरी स्वयंपाक ! पण तिने वागताना ,बोलताना कधी मर्यादा सोडली नव्हती की मान वर करून कुणाशी वरचं आवाजात बोलली नव्हती . त्यामुळे तिचा आदरयुक्त दरारा होता . धाक होता . ज्या लोकांना त्या जागेशी काही घेणं नव्हतं त्यांच्यासाठी सुलक्षणा एक आदर्श होती . काही जण तर टरकून असायचे . ती जेवढं बोलायची तेवढंच उत्तर मिळायचं , पैसे मागितले तर पैसे मिळायचे .
पण म्हणून तिने कधी त्या गोष्टीचा गैर फायदा घेतला नाही . कदाचित म्हणूनच असावं ,तिच्या शब्दाला किंमत होती . पण तरी काही टाळकी उपद्व्यापी असतातच . त्यांना सुलक्षणाचं तिथे राहणं खटकायचं . एक दोनदा प्रयत्न ही झाला ,तिला त्रास देण्याचा ,तिथून हुसकावण्याचा ,पण व्यर्थ उपयोग झाला नाही ……. पण म्हणून त्यांनी प्रयत्न करायचे सोडले नाहीत .
आणि आज …. त्यांनी पुन्हा तो निर्णय घेतला . आपल्याला जर कुणालाच या जागेत राहता येत नसेल , ही जागा वापरता येत नसेल तर हिने एकटीने का वापरावी ? का राहावं इथे ?
.. आणि म्हणून त्यांनी एक भयानक निर्णय घेतला …. ती झोपडी पेटवून देण्याचा .
पण सुलक्षणा ? तिचं काय ? समजा ती मेली तर ? तिचे हितचिंतक ही भरपूर होते . त्यामुळे समजा उद्या आपण पकडले गेलो तर अडचण नको म्हणून त्यांनी एक ठरवलं की काही निमित्त करून सुलक्षणा त्या झोपडीच्या बाहेर राहील ,गावात राहील किंवा कुणाकडे सुरक्षित राहील असं बघायचं !
पण हे काम करणार कसं ?
कारण सुलक्षणा कामाशी काम ठेवायची , कुणाशी जास्त बोलायची नाही . कुणाच्या घरी कामाशिवाय जाणं तिला आवडायचं नाही . शेवटी ही जबाबदारी एका बाईने घेतली . आणि ती आत्ता सुलक्षणाच्या दारात उभी होती .
” कुणी आहे का ?” तिने बाहेरूनच आवाज दिला .
” कोण पाहिजे ?”
मातीने भरलेले हात तसेच ठेवून त्याच हातांनी सुलक्षणा केस सावरत बाहेर आली .
” सुलक्षणा मावशी तुम्हीच ना ? “
” हो ? कोण आपण ?” तिची भाषा अत्यंत शुद्ध होती . शहरी माणसाला लाजवेल अशी .
“मी ओळखलं नाही . “
” मावशी ? मला ओळखलं नाही ? मी सुलु .. तुझी बहीण नाही का सुलभा .. तिची पोरगी ….. सुलेखा ! “
नांव ही खोटं , ओळख ही खोटी …..
” सुलु … सुलेखा …. नाही आठवत नाही …. म्हणजे माझी कुणी बहीण ही नाही आणि भाची ही नाही . “
” मावशी ,असं काय करतेस ? मी का खोटं बोलेन ? वयोमानाने विसरतो माणूस . तसेच चेहरे ही बदलतात …. तू ही खूप बदललीस …. गावात विचारलं , एकाने आणून सोडलं ,म्हणून इथं पर्यंत पोहोचले , नाहीतर अवघड होतं … “
“… बरं .. काय काम होतं ..?”
” मावशी ..? पाणी ही विचारलं नाहीस गं ? किती बदललीस … “
सुलक्षणाला समजलं होतं . ही आपल्याला परिचयाची नाही ! पण दारापुढे आलेला आगन्तुकालाही असं हाकलून देता येत नव्हतं . नाईलाज झाला आणि ती झोपडीच्या आत आली . एका नजरेत झोपडी नजरेखालून घातली . ती फक्त बाहेरून झोपडी वाटत होती . आतला व्यवस्थितपणा , टापटीप वाखाणण्यासारखी होती . सुलक्षणाने हात धुतले .
” ये बाई …. बस …” सुलक्षणाने तिला बसायला पाट दिला .
” मावशी ? एकटीच राहतेस ? मावसा ,पोरं कुठे गेले …. ? “
सुलक्षणाची आता खात्री झाली ,हिला आपल्याबद्दल काहीही माहिती नाही ….
” काय काम होतं ? “
” मावशी ,आईला बरं नाही . का माहित नाही पण ती तुझी आठवण काढतेय ,ती शेवटच्या घटका मोजतेय . आईला जमिनीवर झोपवलंय . कधीही जीव जाईल तिचा …. सारखी तुझं नांव घेत होती . मला ही समजेना , शेवटी आत्याने तुमची ओळख सांगितली . तुमच्या गावाचं नांव सांगितलं ,तेव्हा लगेच निघाले . मावशी हात जोडते . आईला तुमचा चेहेरा एकदा बघायचाय . कदाचित तिची शेवटची इच्छा असावी किंवा तुम्हाला तिला काही सांगायचं असावं ….. असं म्हणतात की मारणाऱ्या माणसाची शेवटची इच्छा पूर्ण करावी . पुण्य लागतं . आईचा जीव अडकलाय तुमच्यात . नाही म्हणू नका …… “
सुलक्षणा धर्मसंकटात सापडली . तिला समजत होतं ही धाधान्त खोटं बोलतेय . पण समजा खरं असेल तर ? आपल्यासाठी कुणाचं जीव तुटत असेल तर ? पण आपली स्मरणशक्ती एवढी कमजोर झाली की आपल्याला काहीच आठवत नाही ? आणि हीच हेतू ही समजत नाही . काय हेतू असणार हीचा ? हिच्या आईचा ? आत्याचा ? की अजून कुणी याच्या मागे आहे …? हो नक्कीच ….
हट्ट करून फायदा नव्हता . एखादा मरतोय ,आपल्यात जीव अडकतोय तर जाणं भाग आहे ….
” बरं , कुठे जायचं म्हणालीस ? “
” वार्कीला “
” वार्की ? ते तर बरंच लांब आहे . “
” हो बस ने दोन तास तरी लागतील … “
” अगं पण बस कुठून मिळणार ? गांवात ही एक दोन तासाने बस येतात . त्यात वार्की साठी बस कधी मिळेल ,काय माहित ? आणि तोवर तिकडे काही कमी जास्त झालं तर …? “
” मावशी , म्हणून म्हणते , पटकन निघू . दुपार झाली आहे , निदान संध्याकाळ पर्यंत तरी पोहोचू . निघायचं ?…. “
” बरं , एक पाच मिनिट देशील .. ? “
” हो … चालेल… “
तिचं काम झालं होतं … ती आनंदात होती . आणि हेच सुलक्षणाला समजेना , हिची आई मरणाच्या दारात असताना हिला आनंद कसला होतोय ? काहीतरी गडबड आहे ! सावध राहावं लागेल …..
क्रमशः –



